Blog

  • अधिकार आमचा च्या बातमीचा इम्पॅक्ट,खरजई नाक्यावर महसूल पथक तैनात

    अधिकार आमचा न्युज नेटवर्क

    संपादक गफ्फार शेख (मलिक)

    उपसंपादक रोहित शिंदे

    चाळीसगाव( प्रतिनिधी)-भडगावकडून खरजई नाक्याच्या मार्गाने चाळीसगाव शहरात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीची बातमी प्रसिद्ध करत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सदर माहिती पत्रकार गफ्फार शेख यांनी सोमवारी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे.

    जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार खरजई नाक्यावर महसूल विभागाचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या.

    सर्रास सुरू असलेल्या या अवैध वाळू वाहतुकीमुळे पर्यावरणालाही धोका निर्माण होत असल्याची चर्चा होती.याबाबतची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार खरजई नाक्यावर महसूल विभागाचे पथक तैनात करण्यात आले असून अवैध वाळू वाहतुकीवर नजर ठेवण्यात आली आहे.

    यामुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासन पुढील काळातही अशाच प्रकारे उपाययोजना करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून अवैध वाळू माफियांवर सातत्याने लक्ष ठेवत कठोर कारवाई करून या अवैध वाळू वाहतुकीला कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

    सोशल मीडियावर महसूल पथकाने एक व्हिडीओत म्हटले आहे की पोलिस प्रशासन या कारवाईत सहकार्य करत नाही ठाणे अंमलदारांना फोन लाऊन कळविले त्यांनी तात्काळ कर्मचारी पाठवितो म्हटले मात्र एक तास झाला तरी पोलिस कर्मचारी आले नाहीत,पोलिस प्रशासन असले की कारवाईसाठी बळ मिळते असे देखील त्यांनी सांगितले आहे.

  • वाळू माफियांची रात्रीची परेड; संबंधित यंत्रणा गाढ झोपेत?

    अधिकार आमचा न्युज नेटवर्क

    संपादक गफ्फार शेख (मलिक)

    उपसंपादक रोहित शिंदे

    चाळीसगाव(प्रतिनिधी)-भडगावकडून चाळीसगाव शहरात अवैध वाळू वाहतुकीचा धुमाकूळ सुरू असून वाळू माफियांनी जणू प्रशासनालाच खुले आव्हान दिले आहे. खरजई नाक्यावरून रात्रीच्या अंधारात एका मागोमाग एक वाळूने भरलेले डंपर शहरात दाखल होत असताना संबंधित यंत्रणांची मात्र संशयास्पद शांतता पाहायला मिळत आहे.

    रात्रगस्तीचे दावे करणारे पोलीस आणि अवैध गौण खनिजांवर कारवाईची जबाबदारी असलेले महसूल पथक नेमके काय करत आहे,असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. डंपरांची वर्दळ सर्वसामान्यांना दिसते,मग ती प्रशासनाच्या नजरेतून कशी सुटते, याचे कोडे नागरिकांना पडले आहे.

    रात्रीच्या वेळी भडगाव कडून खरजई नाक्यावरून शहरात हे डंपर शहरात प्रवेश करत असतात तरी संबंधित यंत्रणा मात्र याकडे सोईसकर दुर्लक्ष करत आहे की त्यांना याबाबत काही माहीत नसल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत.वाळू माफियांच्या डंपरांवर कारवाई न होण्याचे नेमके कारण प्रशासनाचा आशीर्वाद तर नाही ना अशी चर्चाही शहरात रंगू लागली आहे.

    “डंपर धावत आहेत, वाळू वाहते आहे,मग कारवाई कुठे अडकली आहे?” हा प्रश्न आता चाळीसगावकरांच्या ओठावर आला आहे. वाळू माफियांच्या या रात्रीच्या परेडला प्रशासन कधी लगाम लावणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    दिनांक ४ जून रोजी मराठा महासंघाच्या वतीने निवेदन देत अवैध वाळू वाहतुकीवर पोलिस तथा महसूल प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम केले मात्र ही निवेदन देत चार दिवस उलटून देखील अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई झाली नसल्याचे दिसत आहे.

  • मल्हारगडावरील ऐतिहासिक पाण्याच्या टाक्याची गाळसफाई; सह्याद्री प्रतिष्ठानचा प्रेरणादायी उपक्रम

    अधिकार आमचा न्युज नेटवर्क

    संपादक गफ्फार शेख (मलिक)

    उपसंपादक रोहित शिंदे

    चाळीसगाव(प्रतिनिधी)- दि ६ जून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, चाळीसगाव विभागाच्या वतीने किल्ले मल्हारगडावर दुर्गसंवर्धनाची विशेष मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमांतर्गत गडावरील ऐतिहासिक पाण्याच्या टाक्यात साचलेला गाळ, माती व कचरा काढून टाक्याची स्वच्छता करण्यात आली.

    मोहिमेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर दुर्गसेवकांनी श्रमदान करत टाक्यातील मोठ्या प्रमाणातील गाळ बाहेर काढून ऐतिहासिक जलस्रोताच्या संवर्धनासाठी मोलाचे योगदान दिले. पावसाळ्यात अधिक जलसाठा होऊन या पुरातन टाक्याचे जतन व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

    यावेळी केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे यांनी सांगितले की, टाक्यात अद्याप काही प्रमाणात गाळ शिल्लक असून आगामी दुर्गसंवर्धन मोहिमांमध्ये तो पूर्णपणे काढण्यात येणार आहे. गडकोटांचे संवर्धन आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान सातत्याने कार्यरत असून या मोहिमेलाही दुर्गप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

    या मोहिमेत सह्याद्री प्रतिष्ठान, चाळीसगाव विभागातील अनेक दुर्गसेवकांनी सक्रिय सहभाग घेत श्रमदान केले. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ऐतिहासिक जलस्रोतांचे जतन होण्यास मदत होणार असून दुर्गसंवर्धनाबाबत जनजागृतीही अधिक प्रभावीपणे होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

  • पावसाळ्यापूर्वीच विजेचा लपंडाव; उकाडा आणि डासांच्या त्रासाने नागरिक हैराण

    अधिकार आमचा न्युज नेटवर्क

    संपादक गफ्फार शेख (मलिक)

    उपसंपादक रोहित शिंदे

    चाळीसगाव(प्रतिनिधी)-पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना शहर व परिसरात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले असून उकाड्यामुळे घरात थांबणेही कठीण झाले आहे.


    सध्या वातावरणात प्रचंड उष्मा असून त्यातच वीजपुरवठा खंडित होत असल्याने पंखे, कुलर आणि अन्य विद्युत उपकरणे बंद पडत आहेत. परिणामी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळीही वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची झोपमोड होत आहे.


    दुसरीकडे शहरातील अनेक भागांत डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. उकाडा आणि डासांच्या त्रासामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. पावसाळ्यापूर्वी आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याची जबाबदारी असताना वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.


    पावसाळ्यात वीजपुरवठ्यावर अधिक ताण येण्याची शक्यता असल्याने आतापासूनच वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणने ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच डासांच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपालिकेने फवारणी व स्वच्छता मोहिमेला गती द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

  • डेराबर्डीतील बेकरीत घुसून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

    अधिकार आमचा न्युज नेटवर्क

    संपादक गफ्फार शेख (मलिक)

    उपसंपादक रोहित शिंदे
    चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहरातील धुळे रोडवरील डेराबर्डी भागात असलेल्या समर्थ पाव बेकरीमध्ये घुसून एका तरुणावर लोखंडी कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


    मिळालेल्या माहितीनुसार, अजय शिवाजी चव्हाण (वय २४) हा समर्थ पाव बेकरीमध्ये काम करत असताना ममराज हरीलाल जाधव व त्याचा एक अनोळखी साथीदार बेकरीत आले. जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यांनी अजय याच्याशी शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांनी मिळून कमरेला खोसलेला लोखंडी कोयता काढत अजयच्या चेहऱ्यावर, पाठीवर, हातावर आणि पायावर सपासप वार केले. या हल्ल्यात अजय गंभीर जखमी झाला असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.


    घटनेवेळी बेकरीतील इतर कामगार मदतीसाठी धावले असता आरोपींनी त्यांनाही धमकावत, मध्ये पडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला. त्यानंतर दोघेही घटनास्थळावरून फरार झाले. जखमी अजय चव्हाण याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.


    ही घटना ३ जून रोजी दुपारी सुमारे २.३० वाजेच्या सुमारास घडली. अजय चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ममराज हरीलाल जाधव व त्याच्या अनोळखी साथीदाराविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 109, 352, 351(2) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

  • दूध भेसळीची चौकशी व अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाला निवेदन

    अधिकार आमचा न्युज नेटवर्क

    संपादक गफ्फार शेख (मलिक)

    उपसंपादक रोहित शिंदे

    चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहर व तालुक्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील संभाव्य भेसळ रोखण्यासाठी तसेच भडगावकडून सुरू असलेल्या कथित अवैध वाळू वाहतुकीवर तातडीने अंकुश आणण्यासाठी मराठा सेवा संघाच्या वतीने तहसीलदार व अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

    निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, चाळीसगावची ओळख राज्यभर “दुधाचे आगार” म्हणून आहे. अशा परिस्थितीत दूध, तूप, खवा, पनीर, पेढे व इतर दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ होत असल्यास त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दूध संकलन केंद्रे, डेअरी, मिठाई दुकाने, खवा-पनीर उत्पादक व विक्रेते तसेच खाद्यतेल विक्रेत्यांची संयुक्त तपासणी मोहीम राबवून संशयित नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.यासोबतच भडगावकडून चाळीसगावच्या दिशेने सुरू असलेल्या कथित अवैध वाळू वाहतुकीबाबतही निवेदनात गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी डंपर व इतर जड वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक होत असल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकारामुळे शासनाचा महसूल बुडत असल्याबरोबरच पर्यावरणाचेही नुकसान होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.अवैध वाळू वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी खरजई नाका व नागद चौफुली परिसरात रात्रीचे बैठे गस्ती पथक तैनात करावे, महत्त्वाच्या ठिकाणी बॅरिकेडिंग उभारून संशयित वाहनांची तपासणी करावी तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

    हे निवेदन मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अरुण पाटील, डॉ. अजय पाटील, समाधान पाटील, दिनेश पाटील, गोरख साळुंखे, चंद्रकांत तायडे, चिरागोद्दिन शेख, चेतन देशमुख, किशोर जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते रामलाल चौधरी यांच्या वतीने देण्यात आले. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव, अन्न व औषध प्रशासन विभाग जळगाव आणि पोलीस अधीक्षक जळगाव यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर आणि नैसर्गिक संपत्तीची लूट करणाऱ्या अवैध वाळू माफियांवर प्रशासनाने तातडीने धडक कारवाई करावी, अशी ठाम मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे.

  • स्वावलंबनाकडे तृतीयपंथीयांची वाटचाल; चाळीसगावात स्वयंरोजगार व व्यवसाय मार्गदर्शन शिबिर

    अधिकार आमचा न्युज नेटवर्क

    संपादक गफ्फार शेख (मलिक)

    उपसंपादक रोहित शिंदे

    चाळीसगाव (प्रतिनिधी) : तृतीयपंथीय समाजाच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या पुढाकारातून चाळीसगाव येथे स्वयंरोजगार व व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दि २ जुन रोजी करण्यात आले होते. या शिबिराला चाळीसगाव, पाचोरा व परिसरातील तृतीयपंथीय बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

    सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, जळगाव तसेच तृतीयपंथीयांसाठी स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजना जिल्हास्तरीय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराचा मुख्य उद्देश तृतीयपंथीय व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांना रोजगार व उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा होता.

    शिबिरात स्वयंरोजगार, व्यवसाय उभारणी, शासकीय कर्ज व अनुदान योजना, बीज भांडवल योजना, ओळखपत्रे, आवश्यक दाखले तसेच विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. विविध शासकीय विभागांचे अधिकारी, राष्ट्रीयीकृत बँकांचे प्रतिनिधी, जिल्हा उद्योग केंद्र, कृषी विभाग, पुरवठा विभाग आणि संजय गांधी निराधार योजनेचे अधिकारी उपस्थित राहून लाभार्थ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले.

    कार्यक्रमात विशेष अधिकारी अमोल कुलकर्णी, उद्योग निरीक्षक प्रियंका पाटील, विस्तार अधिकारी गौरव पोखरना, उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक गणेश वाघमारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी तृतीयपंथीय बांधवांना उद्योग-व्यवसायाच्या संधी, शासकीय योजनांचा लाभ आणि आर्थिक स्वावलंबनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.

    पाचोरा येथील सीमा जान (गुरू) व चाळीसगाव येथील फिजा गुरू यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण ठरली. यावेळी समाजकल्याण विभागाचे तालुका समन्वयक महेंद्र पाटील यांनी तृतीयपंथीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या बीज भांडवल योजनेची सविस्तर माहिती देत पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन बार्टी व समाजकल्याण विभागाचे तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी केले, तर सागर वीसे यांनी आभार मानले.

    शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी चेतन चौधरी, महेंद्र कुमावत, दर्शन कुमावत, ज्ञानेश्वर लिंगायत, अर्जुन गायकवाड, स्नेहा बोरसे आणि इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे तृतीयपंथीय समाजातील व्यक्तींना शासकीय योजनांची माहिती, आर्थिक सक्षमीकरणाच्या संधी आणि उद्योजकतेसाठी आवश्यक मार्गदर्शन मिळाल्याने त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

  • उकाड्याने हैराण चाळीसगावकरांना दिलासा; वीजांच्या कडकडाटासह दमदार पावसाची हजेरी

    अधिकार आमचा न्युज नेटवर्क

    संपादक गफ्फार शेख (मलिक)

    उपसंपादक रोहित शिंदे
    चाळीसगाव (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा आणि वाढलेल्या तापमानामुळे त्रस्त झालेल्या चाळीसगावकरांना आज दिनांक 31 रविवारी सायंकाळी निसर्गाने मोठा दिलासा दिला. सायंकाळी सुमारे 5 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली.


    दिवसभर कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते. सायंकाळी आकाशात काळे ढग दाटून आले आणि काही वेळातच वीजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. जोरदार वाऱ्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


    अचानक झालेल्या पावसामुळे रस्त्यांवरील वाहनचालक आणि पादचारी यांची काहीशी धावपळ उडाली. तर दुसरीकडे नागरिकांनी या पावसाचे स्वागत केले. पावसामुळे शहरातील वातावरण प्रसन्न झाले असून तापमानातही घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा सामना करणाऱ्या नागरिकांनी या अवकाळी पावसाचा आनंद घेतला. अनेक ठिकाणी लहान मुले आणि युवक पावसात भिजताना दिसून आले. अचानक झालेल्या या पावसामुळे चाळीसगाव शहरासह परिसरात गारवा पसरला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

  • चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती जवळून मोटारसायकल चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

    अधिकार आमचा न्युज नेटवर्क

    संपादक गफ्फार शेख (मलिक)

    उपसंपादक रोहित शिंदे
    चाळीसगाव (प्रतिनिधी): चाळीसगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून एक मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडजी (ता. भडगाव) येथील रहिवासी व शेतकरी बुधा बबन सोनवणे (वय 40) हे 30 मे रोजी सकाळी सुमारे 7 वाजता आपल्या म्हशीच्या विक्रीसाठी चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आले होते. त्यांनी आपली लाल रंगाची सिटी हंड्रेड मोटारसायकल (क्र. MH-19 DK-6928) बाजार समिती परिसरातील एका वडा-पाव गाडी जवळ उभी केली होती.
    यानंतर म्हैस उतरविण्याच्या कामासाठी गेल्यानंतर सकाळी सुमारे 10 वाजता परत आल्यावर त्यांनी मोटारसायकल पार्क केलेल्या ठिकाणी पाहणी केली असता ती तेथे आढळून आली नाही. त्यानंतर त्यांनी बाजार समिती परिसरासह रेल्वे स्टेशन, बसस्थानक, भडगाव रोड, हिरापूर रोड, मालेगाव रोड तसेच शहरातील विविध भागात मोटारसायकलचा शोध घेतला. मात्र, वाहनाचा कोणताही मागमूस लागला नाही.


    चोरीस गेलेली मोटारसायकल लाल रंगाची सिटी हंड्रेड कंपनीची असून तिची अंदाजे किंमत 25 हजार रुपये आहे.
    अज्ञात चोरट्याने 30 मे रोजी सकाळी 8 ते 10 वाजेदरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून सदर मोटारसायकल चोरून नेल्याची तक्रार बुधा सोनवणे यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कॉन्स्टेबल दिपक चौधरी करीत आहे.

  • पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढी विरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन

    अधिकार आमचा न्युज नेटवर्क

    संपादक गफ्फार शेख (मलिक)

    उपसंपादक रोहित शिंदे
    चाळीसगाव (प्रतिनिधी) : पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या सतत वाढत असलेल्या दरांविरोधात चाळीसगाव तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने मालेगाव रोडवरील पेट्रोल पंपावर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून सरकारने तातडीने दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


    काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील ११ दिवसांत पेट्रोल व डिझेलच्या दरात तब्बल आठ रुपये प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ अन्यायकारक असून तिचा थेट परिणाम सामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी व वाहनधारकांवर होत आहे. त्यामुळे सरकारने तातडीने इंधन दर कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.


    यावेळी पेट्रोल, डिझेल व गॅस पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणी दूर करून पुरवठा सुरळीत करावा, तसेच शेती मशागतीच्या हंगामात शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरसाठी डिझेल तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना सादर करण्यात आले.


    या आंदोलनात देवेंद्रसिंग पाटील, वाडीलाल चव्हाण, सुधाकर कुमावत, पांडुरंग राजपूत, दिनेश पवार, मंगलसिंग कछवा, प्रज्वलसिंग जाधव, बापू चौधरी, शिवालाल सूर्यवंशी, दशरथ वाघ, पोपट राठोड, अमजद खान, प्रसन्न खंडाळे, मधु गवळी, नीरज राजपूत, स्वराज पाटील, प्रणव निकम, रमेश शिंपी, रवींद्र चकेले, लिलाबाई राठोड, पंकज शिरोडे, नितीन परदेशी, पवनसिंग राजपूत, पुंडलिक राठोड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.